Monthly Archives: September 2019
तू असा तू तसा.
तू असा तू तसा…
सकाळचे सहा वाजले आहेत .
तुझा आवाज ऐकू येत नाही आहे.
जरासा थाबला आहेस म्हणू?
कि चालला आहेस म्हणू?
अजूनही अंगण ओले आणि आकाश ढगाळलेले
पाने भिजलेली ..ते पाहून मन निराशा झालेले…..
म्हणजे अजून तू रहाणार?आम्हांला अजून धारेवर धरणार?
तू झोडपलेस…बुडवलेस
आमची घरे पाडलीस,
आम्हाला निराधार केलेस
तरी सर्व सहन केले ..
कारण तू तहानलेल्या धरणीला शांत केलेस..
गोकुळाष्टमीला तुझी हजेरी असते.
म्हणून कौतुकच केले तुझे..
पण नारळीपौर्णिमेला हि संततधार
तोच जोर,तसाच भडीमार…!
मनात म्हटले असुदे.
गणरायाचे स्वागत तुझ्या मनात आहे.
तशीही तुझी तुरळक हजेरी असतेच
१० दिवसात..कधीतरी..!
पण म्हणून असे स्वागत करायचे?
आम्हाला घरा बाहेर पडूही दिले नाहीस
गणेशाला डोळे भरून पाहूही दिले नाहीस..
विसर्जनाच्या मिरवणुकीतही सामील झालो नाही.
गणेशाला चौपाटीवर जाऊन निरोपही दिला नाही.
अजूनही तुझे बरसणे सुरूच आहे..
आमची दैना करणे चालूच आहे..!
पण हे काय पाहतेय?
सकाळचे ११ वाजलेले आणि चक्क उन पसरलेले
पाने चमकताहेत ,पांढरे ढग हसताहेत
आणि मधूनच आकाशाचे निळे ठिपकेही दिसत आहेत..
म्हणून च विचारतेय ,
आता जातोयस ना?कि हे आहे मध्यांतर?
हो तसेच आहे तुझ्या मनात खरेतर…!
पहा ना,दुपारचे ३ वाजलेत, उन नाहीसे झालेय.
आणि भर दुपारी संध्याकाळ झालीय..
तुझा जोरही वाढलाय…
विजांचा लखलखाट ,ढगांचा गडगडाट..!
तुझी आता सवयच झाली आहे
सरींची सोबत गृहीतच धरली आहे.
आता जायचे तर दसरा दिवाळी करूनच जा.
दिव्यांची रोषणाई पाहून जा.
आणि फराळाची गोडीहि चाखून जा.
–नीला शरद ठोसर–(१८/९/२०१९)